उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

५ सप्टेंबर, २०२२

श्री गणेश २०२२.

गरुडावरी बैसुनी माझा कैवारी आला

१९ ऑक्टोबर, २०२०

श्री गजानन महाराज हे श्री शिवाचे अंश की श्री रामाचे अंश?

 

केवळ हे जगच नाही तर संपूर्ण ब्रम्हांड जे चालते, त्या व्यवस्थे मागे जी शक्ती आहे त्याला आपण परमेश्वर divine power किंवा ultimate energy म्हणतो. ही एक शक्ती आहे. परमेश्वराचं मूळ रूप हे निर्गुण, निरंजन, निराकार असतं असं सर्व शास्त्रकार आणि संत सांगतात. कुणी त्याला ज्योती ही स्वरूप ही मानतात.
सर्व ब्रम्हांडाचा पसारा हा ३ तत्वांवर चालतो. उत्पत्ती, स्थिती, लय. Creation, Preservation, Destruction. त्याला आपण देव स्वरूप मानून द्वैत किंवा सगूण रूप दिले, ते म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश आहेत. निर्मिती अथवा स्थापना कार्य ब्रम्हा द्वारे होते. पालनपोषण विष्णू द्वारे होते आणि शंकरा द्वारे होतो तो विनाश. म्हणून ब्रम्हा, विष्णू,आणि महेश यांना जन्मदाता, पालनकर्ता आणि मोक्षदाता मानले जाते.
ह्या पालनकर्ता श्रीविष्णूंनी विविध युगात अनेक अवतार घेतले. कृत किंवा सत्य युगात मच्छ, कूर्म,वराह, नृसिंह. त्रेतायुगात वामन ,परशुराम आणि श्रीराम. द्वापार युगात श्री कृष्ण आणि बुद्ध बोधराज स्वामी आणि शेवटचा कलियुगातील कलंकी आहेत . भगवान विष्णूचा सातवा अवतार म्हणजे प्रभू रामचंद्र. शेगाव येथे समाधी मंदिरात श्री गजानन महाजांची समाधी जमिनीखाली भुयारात आहे. मात्र जमिनीलगत श्री राम, सीता माई आणि श्री लक्ष्मणाच्या मूर्ती विराजित आहे. तिथे इतर देवाची मूर्ती / मूर्त्या का नसाव्यात? श्री रामाचे आणि आपल्या महाराजांचे काय ऋणानुबंध असतील असा प्रश्न पडतो नाही का ?
श्री रामाचा पुढचा अवतार श्री कृष्ण हा पारंपरिक हिंदू धर्म कल्पनां नुसार विष्णूचा आठवा अवतार मानला जातो . एकदा रूक्मिणीने काही रागास्तव द्वारका सोडली व दिंडीरवनात अज्ञातवासात आली. नंतर भगवान श्री कृष्ण तिच्या शोधार्थ निघाले. ब-याच ठिकाणी शोध घेतल्यानंतर त्यांना दिंडीरवन जंगलात रूक्मिणी सापडली. तिचा राग शांत केला. नंतर रूक्मिणीसह तेथेच असलेल्या पुंडलिकाच्या आश्रमात आले. तेव्हा पुंडलिक आपल्या आई- वडिलांची सेवा करीत होता. जरी त्याला माहित झाले, की भगवान श्री विष्णु स्वतः भेटायला आलेआहेत, तरी आई- वडिलांच्या सेवेसमोर त्याने तात्काळ भेटण्याचे नाकारून एक वीट त्यांच्याजवळ उभे राहण्यासाठी फेकली. पुंडलिकाची आपल्या आई-वडिलांविषयीची श्रद्धा पाहून भगवान श्री कृष्ण रूपातील श्री विष्णुने विलंबाची पर्वा केली नाही. विटेवर उभे राहून पुंडलिकाची वाट पाहिली. नंतर पुंडलिकाने देवाची क्षमा मागून अशी विनंती केली की, त्यांनी भक्तांसाठी तेथेच असावे. आणि भगवान श्री विष्णुने तसे वरदान दिले. तेव्हापासून भगवान श्री कृष्ण `विठ्ठल` अवतारात आहेत. 
 अर्थात श्री विठ्ठल म्हणजे श्री कृष्णाचे, तसेच श्री रामाचे अवतार. त्याच श्री विठठलाच्या रूपात आपल्या गजानन माउलीने बापुना काळे या भक्ताला दर्शन दिले होते. म्हणजे श्री राम आणि श्री विठ्ठल आणि श्री गजानन महाराज एकच नाही का? दुस-या शब्दात सांगायचे तर श्री गजानन महाराज हे श्री राम अवतारच होय.
असो .
सुरवातीला आपण पाहिले की उत्पत्ती, स्थिती, लय- Creation; Preservation, Destruction या तीन तत्त्वांवर, रज, सत्व, तम, त्रिगुण असलेल्या त्या परमेश्वराची किमया म्हणजे ही जग राहाटी. सृष्टीचा पसारा. नव्हे नव्हे ब्रह्मांडाचा डोलारा. जे जन्माला आले ते लय पावणाराच.
या विनाशाचे कार्य होते श्री शंभो शंकराकडून. या श्री शंकराने जेव्हा समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या विषयाचे प्राशन केले तेव्हा त्यांचा कंठ निळा झाला, सर्वांगाची लाही लाही होऊन आग होऊ लागली. त्यावेळी तो दाह शांत करण्यासाठी खुद्द श्री शंकराने श्री राम नाम जप केला होता अशी आख्यायिका आहे. या श्री शंकराचे अवतार पवनपुत्र श्री हनुमान.
 शिव पुराणानुसार हनुमानाला महादेवाचा दहावा अवतार मानले जाते. श्री मारुती म्हणजेच हनुमान हे श्री महादेवाचा अंश,रुद्रावतार! पण ते आहेत राम भक्त. The God of Destruction worships the God of Preservation. इथे वर वर विसंगत वाटत असले तरी काही गूढ अर्थ आहे. Preservation, Destruction go hand in hand. They cooperate and not compete each other.
ते प्रतिस्पर्धी नसून एकमेकांचे सहाय्यक आहेत. जे जन्माला आले ते लय पावणारच, तेही पुन्हा जन्म घेण्यासाठी. म्हणूनच श्री हनुमान हे श्री राम भक्त. श्री रामाचा महान भक्त, दास, दूत, अनन्य मित्र, सहायक मानला जातो. जिथे राम तिथे हनुमान आणि जिथे हनुमान तिथे राम. म्हणूनच भक्ती , शक्ती ,बुद्धी दायक हनुमान स्तोत्र किंवा चालीसा दररोज म्हटल्यामुळे रामकृपा होतेच. मानवाचे सर्व भय, चिंता दूर होतात.
समर्थ रामदास स्वामी(नारायण) यांचा जन्म रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर, म्हणजे माध्याह्नी झाला. असे असले तरी त्यांना हनुमानाचा अवतार समजले जाते. त्यांना प्रत्यक्ष प्रभु रामरायांनी दर्शन दिले. त्यांनी समर्थांना मंत्रोपदेश देऊन १३ अक्षरी श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करण्यास सांगितले. समर्थ रामदास हे हनुमानाचे अवतार असले तरी साक्षात प्रभु श्रीराम हेच त्यांचे सद्‌गुरू होते. श्री गजानन विजय ग्रंथातील नवव्या अध्यायात आपण हे वाचतोच की श्री गजानन महाराज हे श्री रामदास स्वामींचा अवतार होते. आपल्याला हे ही माहीतच आहे की महाराज मारुती मंदिरात सतत वास्तव्य करून असायचे. अध्याय ६व्यात आपण हे ही वाचतो की पिंपळगावच्या जंगलात एका शिवाच्या मंदिरातील गाभा- यात ध्यानस्त अवस्थेत बसले होते. म्हणजेच आपली माउली श्री गजानन महाराज श्री शिवाचा, श्री हनुमंताचा, श्री रामदास स्वामींचा अवतार. आता हे सर्व राम भक्त . असे असेल तर ते श्री गजानन महाराज हे श्री शिवाचे अवतार असून हे ही राम भक्त असायलाच हवे.
आता श्री गजानन महाराजांना रामभक्त म्हणा की खुद्द श्री रामाचा अवतार म्हणा. श्री शिवाचा अंश म्हणा की श्री शिवाचा अवतार म्हणा. त्यांच्यात विष्णू,आणि महेश यांची पालनकर्ता आणि मोक्ष दाता अशी दोन्ही तत्वे सामावलेली आहेत.अनंत कोटि ब्रम्हांडाचे नायक असलेले आपले सदगुरु श्री गजानन महाराज साक्षात परब्रह्म आहेत.
जसे आपल्या आईला मॉं म्हणा की मॉम म्हणा. ती आपली माउली असते. तसेच श्री गजानन महाराजांना संत म्हणा, देव म्हणा. अंश म्हणा किंवा अवतार म्हणा. रामाचा म्हणा की शिवाचा! आपल्या साठी आपले महाराजच परब्रम्ह आहेत.

२३ ऑगस्ट, २०२०

श्रीफळातील श्री गणेश २०२०

 ह्या वर्षी   श्री गणेशाला बसायला श्री फळाची कल्पना सुचली. पण संपूर्ण पणे बंद न फोडलेल्या अश्या श्रीफळात बाप्पा कसे काय बसणार? काही सुचेना. मग नारळाच्या वाटी करून तेच मखर करण्याचे ठरवले. . 

खरे  तर नेहमी  नारळ आडवा फोडतात. पण तसे करायचे तर बाप्पाच्या  मूर्तीच्यावर ती  वाटी आली  असती.  त्यात  बाप्प्पाची मूर्ती ठेवता येणार नव्हती. 

म्हणून  नारळाला उभा छेद दिल्यावर जशी नारळाची वाटी दिसेल असे मखर  करायचे ठरवले. मूर्तीपेक्षा  मोठे पांढ-या  रंगाचे भांडे घेऊन त्यावर Coconut Fiber Planter Liner  सुई  दोऱ्याने   शिवले.  वरती शेंडीचा आकार दिला.  आणि नारळाची वाटी तयार केली.  टेबलावर वाळू टाकली आणू त्यात ही वाटी निटशी बसवली.   एका पुठ्ठ्यावर निळ्या आकाश काही ढग  असलेला कागद चिटकवला आणि त्यावर नारळाचे झाड काढून  रंगवले.  हे चित्र टेबलाच्या  मागे ठेवून  टेबलाच्या बाजूला नारळाच्या झावळ्या सारखी पाने असलेली  पामची झाडे ठेवली. आणि बाप्प्पाचे मखर सुशोभित केले . 




२४ मे, २०१५

` हरिहर गुरुवर, नाही चिलमी बहाद्दर!`

चिलीम द्यावी भरुन तंबाखूची मजकारण विस्तव वरी ठेवोनिया 
सकाळपून ऐसाच बसलों  चिलीम मुळीं नाहीं प्यालों त्यामुळें हैराण झालों भरा चिलीम मुलांनो।।
गांजा तमाखू पीत बसतो।
चिलीमीवरी प्रेम भारी। ती लागे वरच्या वरी।
कां कीं या गांजावर।  समर्थांचे प्रेम फार 
मर्जी असल्या गांजा आणा 
ह्या  संतकवी श्री दासगणू  महाराज यांनी  श्री गजानन विजय ग्रंथात लिहिलेल्या  श्री गजानन महाराजांच्या चिलीमीबद्दलच्या ओव्या!
      हे वाचल्यावर किंवा श्री  गजानन महाराजांचे  छायाचित्र पाहून  काही अतिहुशार लोकं  जरूर विचारतात की हे तुमचे महाराज म्हणे देवाधिदेव , सत् गुरू, साक्षात परब्रम्ह ! मग असे गांजा, चिलीम ओढणारे कसे ?  आम्ही ही चरस, गांजा ओढला तर काय बिघडले?
          
हे असे प्रश्न  पडतात  ते केवळ देहबुद्धी (देह  म्हणजेच मी ही  गैर समजूत)पहात असलेल्या अज्ञानी  लोकांना. त्यांना  केवळ वरवरचे दिसते. स्वत: महाराजांना देहबुदधी नव्हती.   केवळ देहाने अन्न भक्षिले म्हणून त्या  देहाला पाणी  पाहिजे   हा  व्यवहार  आहे असे श्री गजानन महाराज स्वत: म्हणत.  त्यांचे  शरीर मानवी होते म्हणून  खाणे, पिणे, निजणे हे शरीर धर्म चालत असत.  त्यात सर्व सामान्य नियम असा नव्हता.  ते कधी  सतत खात बसत , तर कधी उपाशी रहात.  कधी अनेक  दिवस हालचाल ही करता निचेष्ठित पडून रहात  तर कधी मनाला वाटेल त्या जागी भटकत रहात.  हे  असे  सामान्य माणसाचे  वागणे नव्हेच.  त्यांची ती असामान्यता  अभ्यासून, पारखून  पहावी आणि मगच त्यांच्या बद्दल कुचेष्टेने बोलावे.
      
वरील ओव्यांवरून श्री गजानन  महाराजांना चिलीम  आवडत असेल, वरचे वर ओढायला लागत असेल असे निश्चित होते. पण ती  त्यांच्या मानवी देहाला.   त्या असामान्य व्यक्तिमत्वाच्या  मानवी देहाशी तुलना करायची असेल तर जरूर करा. अगदी चिलीम, गांजा ही  ही ओढा. परंतू  त्याच देहात जी  वेद वेद्येची जाण  होती, विविध रागातून  गाऊन दाखावण्यासारखी   गायन कला होती, योग बलाचे सामर्थ्य होते, कुणाचेही भूत ,भविष्य, वर्तमान काळाचे ज्ञान होते ते  तुमच्या शरीरात हे  सर्व आहे का ते तपासून पहा. नसेल तर तसे सामर्थ्य आणायचा प्रयत्न तरी करा .  श्री गजानन महाराजांप्रमाणे निसर्गावर प्रभुत्व मिळवून कोसळणा-या पर्ज्यन्याला  थांबवायची किमया   करता येईल का तुम्हाला ? द्वाड   प्राण्यांना  कायमचे काबूत आणून  त्यांना सगुणी बनवू शकाल?  यावर तुमचे उत्तर `नाही`  असेल यात  शंका  नाही. त्या चिलीमीचे   उदाहरण देऊन संत शिरोमणी श्री गजानन  महाराजांची  चेष्टा , कुचेष्टा करून  नका .  त्यांच्याशी तुलना करायची आपली  पात्रता आधी पडताळून पहा.
       एका गोसाव्याने  त्याची आठवण नित्य रहावी म्हणून बुटी स्वीकारा अशी नम्र   विनंती  केली.   जसे आई आपल्या लहान  बाळाचे  वेडेवांकुडे हट्ट  पुरवते तसेच  महाराजांनी महाधूर्त अश्या गोसाव्याची विनंती मान्य केली. तेव्हा पासून महाराजांना गांजा अर्पण करण्याची गावात प्रथा पडली.  श्री गजानन महाराजांना चिलीम प्रिय असली तरी त्याविषयी आसक्ती, आकर्षण, व्यसन  असे नव्हते.
 
श्री दासगणू महाराज म्हणतात ," परी व्यसनाधीनता नच आली समर्थांतें पद्मपत्राचियेपरी ते अलिप्त होते निर्धारी।
कमळ आणि त्याचे पान  चिखलात राहूनही त्यांना  चिखल लागत नाही. तसेच   श्री महाराज अश्या पापी, ढोंगी, स्वार्थी, दुर्जनांमधे राहूनही  वाईट प्रवृत्तीने  कधीच बरबटले नाहीत.  म्हणूनच त्यांची सर कुणालाच येऊ शकत नाही. ते खरोखरीच  थोर संत होते.
पोकळ चिलीम मानवी देह किंवा शरीरासारखी आहे.   त्यात भरलेले काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर हे त्या गांजा, तंबाखू सारखे क्षणभर सैलावून विसावा दिल्याचे भासवणारे आहेत.  आणि कालांतराने त्यांच्या अधीन करणारे, त्यांचे सेवक  बनवून स्वत:ची  मनमानी करून  जीवनाला  अधोगतीकडे नेणारे नाश कारकही आहेत.  त्यां षडविकारांंना काबूत आणायचे काम सोपे नाही.  त्यांच्या समोर  उपासानेची, भक्तीची ज्योत पेटवा.  ते दुर्गुण जाळून टाका. तल्लफ पुन्हा पुन्हा येऊ  द्या,  त्या उपासनेची, भक्ती करण्याची!  नशा  चढू द्या  पण  त्या षडरीपूंना  जाळण्याची!   त्या दुर्गुंणांची  राख करून टाका म्हणजे ती देह रूपी चिलीम रिकामी होईल.   त्या देह रूपी चिलीमीची  आसक्ती , लोभ  राहणारच नाही.   देहबुद्धी जळून जाईल  आणि  त्या देहाशी लगटलेले इतर विकार, अविचारही  ही जळून जातील. सरते शेवटी हा पंचमहाभूतांपासून बनलेला देहही चिलिमीप्रमाणेच  जळून जाईल आणि  राहील ती  मुठभर माती, त्या पंचमहाभूतां मध्ये  पुन्हा  विलीन होण्यासाठी!
कुणाला  श्री गजानन महाराज वेडा पिसा, मैंद, चांडाळ, नागवा जोगी,भोंदू साधू वाटत असतील तर तो  त्यांच्या अज्ञानातून किंवा क्षुल्लक  ज्ञानातून  उठलेला  अहंकार आहे. त्यांचे संपूर्ण चरीत्र  माहित करून घेण्याआधी तुटपुंज्या ज्ञानावर उगाचच दूषण  देणा-या दुरात्मा, दूराभिमान्याला  काय म्हणावे? डोळ्यांनी पहात असलेले दृश्य सत्यच मानले पाहिजे. पण त्या क्रीयेमागाचे कार्यकारण भाव समजून घेतले पाहिले.
  श्री  गजानन महाराज म्हणतात,"  "जो माझा असेल | त्याचेच काम होईल | इतरांची ना जरूर मला ||." आपले  द्वैतातील  मागणे   असो  किंवा  अद्वैतातील मोक्षप्राप्तीची ओढ  असो.  आपल्या कुठल्याही  मनोकामना पूर्ण करण्याची ग्वाही   "श्रीगजाननस्वामी चरित्र जो नियमें वाचील सत्य त्याचे पुरतील मनोरथ गजाननकृपेनें  |"  या श्री गजानन  ग्रंथातील  ओव्या  आपल्याला   देतात.
 आपल्या सर्वांना माहीतच आहे " जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. "   मीठ आणि साखरेतील फरक नुसते पाहून समजणार नाही तर दोन्ही चाखून पाहावी लगतात. केवळ अनुभवातून चव कळेल.तसेच संत शिरोमणी श्री गजानन  दिव्यत्वाचा अनुभव येण्यासाठी वारांगना अभक्ति  टाकून त्यांच्या निष्ठा ठेवून सेवा , उपासना,   भक्ती करणे आवश्यक आहे.  श्री गजानन महाराजांच्या  चरित्राचे नियमित  वाचन करावे , त्यातील  उपदेश  गजाननपदीं निष्ठा  ठेवून आचरणात आणावेत .   तर्क ,वितर्क , कुतार्काला जरा ही  थारा देता  सुखाचा अनुभव सदा सर्वदा घ्यावा. कारण
या गजाननरुप जमिनींत जें जें कांहीं पेराल सत्य तें तें मिळणार आहे परत बहुत होऊन तुम्हांला॥
जय गजानन