मी जेव्हा पर्यटक म्हणून चीनची भिंत बघायला गेले, तेव्हा ती भव्यता पाहून खूप आश्चर्य वाटले. आमच्या गाईडने दिलेली माहिती मी ऐकून घेतली. केबलकारने वरपर्यंत गेले, पायी उतरत खाली आले, माहितीपत्रके घेतली, खूप सारे फोटो काढले. बस! यापेक्षा अधिक रस घेण्यासारखे खरोखरच तेव्हा काहीही वाटले नाही. पर्यटक म्हणून कुठे गेल्यावर त्या जागेशी क्वचितच जवळीक वाटते, असे माझे मत आहे.
अतिश्रम, उपासमार, शारीरिक छळ, वेदना, मानसिक कुचंबणा, घरच्या लोकांची काळजी यासारख्या कारणांमुळे कित्येक कामगार तिथेच शेवटचा श्वास सोडत. त्यांना जिथे गाडले जाई त्या भिंतीच्या भागाला वॉच टॉवरला, अरुंद रस्त्यांना त्या मजुराचे नाव दिले जाई. तोच प्रकार तिथे काम करणाऱ्या सैनिकाचाही. काही मजूर, सैनिक यांनी तिथून घरी पळून जायचा (अयशस्वी) प्रयत्नही केला. अनेक मजुरांना शस्त्र हातात घेऊन सैनिक बनून, जमत नसूनही युद्ध करावे लागत होते. यात अनेकांचे नाहक बळी जात असत. असाच एक निराश परंतु शहाणा मजूर
आपल्या नवतरुण पत्नीला कळवतो...
विवाह कर नवा,
थांबू नको जरा,
काळजी घे नवीन कुटुंबाची
आणि आठव...
हरवलेल्या या पतीला
कधी एकदा तरी....
घरीही यापेक्षा काही वेगळी स्थिती नव्हती. गरिबी तर पाचवीला पुजलेली! घरचा पुरुष हा त्या भिंतीला जणू वाहिलेला. मग मुला-बाळांची, घरच्या वृद्धांची सर्व जबाबदारी स्त्रीवर. अशा एकाकी महिलेचे दुःख कवितेतून वाचायला मिळाले.
अश्रू पडती फुलणा-या पाकळी,
शरद वारा गातो विरहाचे गाणे.
अनोळखी ती वाट भिंतीची,
तरीही आले होते तिथे मी,
कालच्या स्वप्नी...
सणासुदीला, आजारपणात, आप्तांच्या मृत्युसमयीही न परतलेल्या आपल्या नव-याच्या आठवणीने बेजार झालेली एक महिला लिहिते...
आज माझा सखा,
नाही आला.
तो त्या भिंतीप्रमाणे,
`दगड' `न व्हावा.
म्हणते...
सकाळच्या प्रहरी
पक्षी उठण्याआधी
हवा तयार रेशमी कोट
बधिर बोटे विणती सुयांनी,
कातरही पकडता येईना,
हा प्रेमाचा कोट
जाई दूर प्रवासी
कोण जाणे केव्हा
मिळेल माझ्या प्रियाला... "
तरुण मुलांना भिंत बांधण्यासाठी नेऊ नये म्हणून काही आया आपल्या मुलांना घराबाहेर पाठवतच नसत. आजारी असल्याची खोटी कारण देऊन टोलवण्याचा प्रयत्न करीत. तरीही जबरदस्तीने कामाला नेलेल्या मुलाची एक आई विचारते
"मला मुलगा झाला,
दिला तिथे कामाला,
परतून आला
तर ओळखेल ना मला?"
एका तरुण स्त्रीच्या प्रियकराला भिंतीवर जबरदस्तीने कामाला नेण्यात आले. लवकरच परतेन, असे आश्वासन देऊन तो निघून जातो. बरेच दिवस वाट पाहून त्याची प्रेयसी त्याला शोधायला एकटीच बाहेर पडते. एवढी लांब वाट चालत चालत ती भिंतीपर्यंत पोचते. प्रियकराचे नाव विचारत विचारत शोधत राहते. नंतर कळते, की काही मजुरांचा तांडा दुस-या जागी हलवलेला आहे. दमूनथकून गलितगात्र झालेली ती तरुणी तिथेच गतप्राण होते. भिंतीवर काम करणा-या त्या मजुरांचा जन्म जणू त्या भिंतीसाठीच व मृत्यूही त्या भिंतीसाठीच!
यांना उद्देशून एक लेखक सांगतो, "
"भिंत वाढते आहे मैलो न् मैल,
सोडून विधवा मागे मैलो न् मैल! "
आणि अशा त्यागाच्या, कष्टांच्या एक-एक पायरीमुळेच चीनची भिंत 'ग्रेट' झाली आहे.

(हा लेख ‘ई-सकाळ‘ वृतपत्रातील पैलतीर पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)
वरील काव्यपक्ती भाषांतरीत केल्या आहेत.
वरील काव्यपक्ती भाषांतरीत केल्या आहेत.

चीनची ही शब्दचित्रे खरे तर मी अनेकदा वाचली आहेत. पुन्हा पुन्हा वाचली तरीही त्यांचा ताजेपणा संपतच नाही. मग असे जर आहे तर मी इथे अजूनही प्रतिसाद कसा नोंदवलेला नाही ह्याचे मलाच आश्चर्य वाटले.
उत्तर द्याहटवाचिनच्या भिंतीची कविता आणि अनुवादही आवडला. जगातील दोन क्रमांकाची तटबंदी राजस्थानात कुंभलगढला आहे. आम्ही तर तीही पाहिलेली नाही. मात्र महाराणा कुंभकर्ण यांचे अद्भूत चरित्र तुला माझ्या मेवाडच्या प्रवासवर्णनात अवश्य वाचायला मिळू शकेल.
तुला जग पाहण्याची दृष्टी लाभलेली आहे. असेच जग पाहत राहा. वर्णन त्याचे सजवत राहा. आम्ही जर जाऊ न शकलो तर, त्यातूनच आम्ही तेही पाहू.